Tuesday, May 28, 2013

गडकोट - इतिहासाचे मूक साक्षीदार ( भाग - 2)

 गडकोट - इतिहासाचे मूक साक्षीदार  ( भाग - 2)


 .....................................................................


शिवनिर्मित किल्ल्यांची प्रमुख वैशिष्ट्ये
 

प्रतापगड, राजगड, सिंधुदुर्ग, रायगड असे शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले आणि सिंहगड, पन्हाळा, जंजीरा अशा जुन्या किल्ल्यांची तुलना केली, तर काही वैशिष्टे सहज नजरेत भरतात.
 
१) डोंगरी किल्ल्यांची प्रमुख व बाह्य तटबंदी शिवनिर्मित किल्ल्यांवर पायथ्यापासून साधारणत: किल्ल्याच्या उंचीच्या २/३ उंचीवर बांधलेली दिसते, किल्ल्याचा मुख्य दरवाजाही याच तटबंदीत असतो. रायगडाचा मुख्य दरवाजा असणारी तटबंदी, टकमक टोक व हिरकणी बुरुजांच्या दरम्यान पायथ्यापासून २/३ उंचीवर आहे, तसेच प्रतापगडाची माची आणि बालेकिल्ला यामध्येही उंचीचा फरक आहे.

२) डोंगरी किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे येणारी वाट डोंगर उजवीकडे ठेवुनच येते. शिवकालात किल्ले जिंकताना  बंदुका, धनुष्यबाण, भाले-तोफा यांचा जरी वापर होत असला, तरीही किल्ल्याचा मुख्य दरवाज्याशी होणारी लढाई ही प्रामुख्याने ढाल-तलवार वापरुनच होत असे. उजव्या हातात असणारी तलवार वार करण्यासाठी आणि डाव्या हातातली ढाल प्रतिस्पर्ध्यांचे वार झेलण्यासाठी वापरली जात असे. किल्ल्याकडे येताना उजवीकडे असलेला डोंगर, व तेथील तटबंदीवर बसलेल्या सैनिकांकडून छोटे मोठे दगड-गोटे, जळते बोळे, बाण, भाले, बंदुकीच्या गोळ्या इत्यादीं वस्तुंचा होणारा मारा या आफतीपासुन बचाव करण्यासाठी प्रतिस्पर्ध्याच्या हातात बांधलेल्या ढालीसारख्या संरक्षक कवचाचापण काहीही उपयोगे होते नसे. म्हणजे किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे येणारी वाट नियोजनपुर्व आखली तर त्याचाही फायदा उठवता येतो, शत्रुंच्या अडचणीत भर टाकता येते असा बारीक सारीक तपशीलाचा दुर्गबांधणीत अभ्यास केलेला आढळतो.  जुन्या सिंहगड, पन्हाळा, विशाळगड वगैरे किल्ल्यावर नसलेली ही बांधणी रायगड, प्रतापगड वगैरे शिवनिर्मित किल्ल्यांवर मात्र आवर्जुन दिसते.    
 
३) किल्ल्याचं प्रत्यक्ष दार लपवलेले असुन, ते दर्शनी नसते. प्रवेशद्वार नक्की कुठे आहे, हे गडाखालुन सांगता येत नाही. प्रत्यक्ष दरवाजाची रचना शिवनिर्मित दुर्गावर ’गोमुखी’ बांधणीची आहे; दाराच्या बाजुचे बुरुज दाराच्या दोन्ही अंगाने पुढे वाढवायचे आणि एक बुरुज वळण देऊन दाराला मिठीत घेऊन दुसऱ्या बुरुजासमोर येईल अशी रचना म्हणजे गोमुखी रचना. काही किल्ल्यांवर, विशेषत: भुईकोट किल्ल्यांवर दार दिसू नये व थेट दारावर मारा करता येऊ नये म्हणुन दाराच्या समोर काही अंतरावर आणखी एक जाड भिंत किंवा बुरुज बांधला जाई. संरक्षणासाठी एकच दरवाजा पुरेसा नसल्यामुळे या दरवाज्याच्या मागे पुन्हा दरवाजे बांधले जात. एवढं करुनही मुख्य दरवाजा पडलाच, तर एकामागोमाग एक असणाऱ्या तटबंदीच्या जागा, चौक्या, त्यांच्यामधुन अंगावर येणारी वाट वगैरे रचना शत्रुसैन्याचं मनोधैर्य कमी करण्यात मोलाची मदत करत असत.
 
खरं तर प्रत्येक किल्लाच वैशिष्ट्यपुर्ण असतो, तरीही काही निवडक किल्ल्यांची वैशिष्टे अधिक ठळकपणे मनात भरतात, त्या त्या वैशिष्ट्यांसाठी तरी ते किल्ले पाहिले / अभ्यासिले गेलेच पाहीजेत. ’सह्याद्री’ या ग्रंथात महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे अतुलनीय महत्व लिहिले गेले आहे, "वस्तुत: दिल्ली व आग्रा येथील किल्ले हे राजवाडे आहेत. छावणीतल्या जनानखान्याभोवती रेशमी कनाती लावतात. ह्या राजवाड्यांभोवती अशीच देखणी तटबंदी आहे. त्यांची तटबंदी सुंदर लालसर रंगाची आहे, त्यांच्या कंगोऱ्यांना किंवा महाद्वारावरील नक्षीलाही धक्का बसलेला नाही. या किल्ल्यांच्या अंतर्गत भागात संगमरवरी महालांच्या रांगा असून, त्यांचे सौंदर्य अद्वितीय आहे. पृथ्वीवरील स्वर्ग स्वर्ग तो हाच, असे काही ऎकले ना म्हणजे उत्तर हिंदुस्तानातले लोग निश्वास सोडतात, पण बिचाऱ्यांच्या लक्षातही येत नाही की त्यांचा हा स्वर्ग त्यांच्याच पुर्वजांच्या मुडद्यांवर उभारलेला आहे. या किल्ल्यांनी प्रत्यक्षपणे मर्दुमकी कधी पाहिली नाही, येथे शस्त्रांची जी चमक दिसली ती फक्त खुनी खंजीरांची, मसलती झाल्याच असतील तर आप्तस्वकीय आणी हिंदुंच्या नि:पाताच्या. शाही वैभवांच्या या अवशेषांचे महत्व काय तर शोभिवंत पण निरुपयोगी सोन्यारुप्याच्या तोफांइतकेच. आग्राच्या किल्ल्यात जर कोणाची मर्दुमकी प्रकट झालीच असेल तर ती शिवरायांची. घन्य त्यांची की मोगल साम्रज्य वैभवाच्या कळसावर आणि सामर्थ्याच्या शिखरावर असताना, भरदरबारात या महायोध्याने औरंगजेबाचा आणि त्याच्या सहकाऱ्यांचा जाहिर निषेध केला; त्यांच्या डोळ्यात धुळ फेकून स्वराज्यात परत आल्यावर त्यांनी मोगलांच्या प्रतिकारासाठी त्यांच्याच मुलुखातुन गोळा केलेल्या लुटीतून स्वातंत्र्यसाधनेसाठी जागोजागी दुर्दम्य, बेलाग व दुर्गम गड उभारले."
 
महाराष्ट्राचे दुर्गकारण यशस्वी करणाऱ्या या पहिल्या छत्रपतिंच्या किल्ल्यांमधूनच अनेकांनी प्रेरणा घेतली. अत्याचारी मोघल आणि कावेबाज इंग्रजांशी याच किल्ल्यांच्या मदतीने शेवटपर्यंत मराठी मन लढलं, त्यांची मनगटं पिचली, पण लाचार होणे हे मराठी रक्ताला कधीच मान्य नव्हते. याचाच परिणाम असा झाला की १७व्या शतकापासून १९व्या शतकापर्यंत या किल्ल्यांवर परकियांची अनेक आक्रमणे झाली, लढाया झाल्या, इथल्या तट बुरुजांवर तोफगोळ्यांचा भडिमार झाला, या किल्ल्यांमधुन निखळलेला प्रत्येक चिरा आपल्या स्वातंत्र्ययुद्धातील शौर्याची, बलिदानाची कहाणी सांगतो. ढासळलेले बुरुज, माना टाकलेल्या कमानी, नामशेष झालेल्या इमारती, भग्नावशेषातील टाकी हे किल्ल्यांचे आजचे दर्शन असले, तरी ही परीस्थिती स्वदेश-स्वधर्म-स्वराज्य यांच्या रक्षणासाठी केलेल्या हौतात्मातून निर्माण झाली आहे.

उत्तरेतील तथाकथित राज्यकर्त्यांच्या नावात फक्त नावाचाच सिंह होता, स्वत:चे अंगभुत गुरगुरणे, आपल्या सावजावर निर्भयपणे झेप घेऊन त्याला कंठस्नान घालणे हे गुण विसरुन आपली गोंडेदार शेपटी दिल्लीच्या तक्तारुढ सत्ताधिशांपुढे हलवत, आपटत वर्षोंनवर्षे हे सिंह माना खाली घालुन उभे होते. त्यांच्या किल्ल्यांची आज असणारी उत्तम तब्बेत म्हणजे त्यांच्या निर्लज्जपणाची लक्तरे आहेत, स्वत:चे राज्य वाचवण्यासाठी आपल्या अस्तित्वाबरोबरच आपल्या लेकीबाळींना धर्मांध, अत्याचारी सुलतानांच्या जनानखान्यात लोटणारे तसेच त्यातच आपल्या राज्याचा उत्कर्ष आहे असे समजुन धन्यता वाटणारे हे ‘सिंह’. किल्ल्यांचा उपयोग लढण्यासाठी असतो हे विसरुन गेलेल्या राज्यकर्त्यांच्या सुंदर किल्ल्यांपेक्षा महाराष्ट्रातले ढासळलेले गडकोट जास्त मोहिनी घालतात, या ढासळलेल्या, पडलेल्या, उध्वस्त गड-कोट-किल्ल्यांबद्दलच समस्त मराठी मनांना आदर, प्रेम, अभिमान वाटतो. 

रेवा वरदा कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी, एकपणाचे पाणी भरती मातीच्या घागरी
भीमतटीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा, जय महाराष्ट्र माझा ।
भीती न आम्हा तुझी मुळी ही, गडगडणाऱ्या नभा, अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जीभा,
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभु राजा, दरीदरीतुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा ।
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी ।
दारिद्राच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देशगौरवासाठी झिजला ।
दिल्लीचे ही तख्त राखतो, महाराष्ट्र माझा ।
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥

या पुरातन वास्तुच्या अंगाखांद्यावरुन फिरताना महाराष्ट्राची थोरवी सांगणारी स्वातंत्रगीते मनात घर करुन रहातात, कारण काही अपरिहार्य कारणांसाठी शहरात स्थायिक झालेली माणसे, तनामनानी मावळेच असतात. शिवरायांच्या आणि त्यांच्या वंशजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे गड किल्ले आम्हा शिलेदारांना कोणत्याही परिस्थितीत न डगमगता, कुठल्याही वादळाचा सामना करायची शक्ती देतात, आणि म्हणूनच प्रत्येक सुट्टीत आपल्या दुर्गमित्रांच्या सहवासाला आतुरलेली मने वाऱ्याच्या वेगाने गावाची वाट धरतात.  

1 comment: